Sangli Jat Election Controversy; Congress Candidate Defeat By Vote Rigging Claim Vishal Patil |…

सांगली जिल्ह्यात जत विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार हरला नाही, तर त्याला मतचोरीच्या माध्यमातून हरवण्यात आले, असा दावा काँग्रेस समर्थक खासदार विशाल पाटील यांनी केला आहे. ज्या गावात 500 मतदार आहेत, त्या गावात 1500 मतदान झाले. आपण गाफिल राहिलो.
.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच मतचोरीच्या मुद्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्ला चढवला होता. त्यानंतर विशाल पाटील यांनी त्यांच्या सुरात सूर मिसळत वरील आरोप केला. ते म्हणाले, जत विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार हरला नाही. त्याला मतचोरीच्या मदतीने हरवण्यात आले. हा प्रकार ठरवून करण्यात आला. जो माणूस 5 पिढ्यांपासून जत मतदारसंघातील रहिवाशी आहे, त्याची जात, धर्म पाहून त्याचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले. त्यानंतर जो व्यक्ती मतदारसंघातील रहिवासी नाही त्याचे नाव मतदार यादीत टाकण्यात आले. असे अनेक प्रकार समोर आलेत.
500 मतदारांच्या गावात 1500 मतदान
ते पुढे म्हणाले, ज्या गावात केवळ 500 मतदार आहेत, त्या गावात तब्बल 1500 मतदान झाले. आपण गाफिल राहिलो. त्यामुळे कुठूनही माणसे आली आणि मतदान करून गेली. आजची राजकीय परिस्थिती पाहिली तर लोकशाहीची मूल्ये धोक्यात सापडल्याची स्पष्ट जाणिव होते. एकीकडे विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल सुरू आहे, तर दुसरीकडे दडपशाही व कटकारस्थानांचा खेळ सुरू आहे. खासदार राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा समोर आणून या सरकारला उघडे पाडले आहे. संविधानाने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकारही या हुकूमशाही सरकारने आपल्यापासून हिरावून घेतला. हे सरकार मतांची चोरी करून खुलेआमपणे सत्ते आले आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने या प्रकरणी सजग राहून वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.
काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याची गरज
काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनीही यावेळी काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. सध्या काँग्रेस पक्षासाठी आव्हानकारक काळ आहे. पण अशा काळातच संघटनेची खरी ताकद स्पष्ट होते. काँग्रेसच्या विचारधारेचा पाया लोकशाही, समानता व न्यायावर आधारित आहे. काँग्रेसचा विचार हा शाश्वत व विश्वासार्हता जपणारा असून, तो युवापिढीला भावणारा आहे. फक्त आता हा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. संघटनेतून नवे नेतृत्व तयार करण्याची, संघटना बळकट करण्याची व पक्षाचा झेंडा अधिक उंच करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे ते म्हणाले.
गोपीचंद पडळकरांनी केला होता विक्रमसिंह सावंत यांचा पराभव
उल्लेखनीय बाब म्हणजे जत विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर व काँग्रेस उमेदवार विक्रमसिंह सावंत यांच्यात थेट लढत झाली होती. त्यात पडळकर यांनी सावंत यांचा तब्बल 37 हजार 881 मतांनी दारुण पराभव केला होता. जत हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. पण प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपने बाजी मारल्यामुळे येथील निकालाची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती.