राज ठाकरेंना टाळी देणार का? दादू उद्धव ठाकरे आता स्पष्टच बोलले

मुंबई, 27 जुलै : अजित पवारांच्या सत्तासहभागानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना ऊत आला होता. मनसैनिकांकडून याबाबत उघडपणे बॅनरबाजीही करण्यात आल्यानं, ठाकरे बंधू जवळ येणार का? याबाबत संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती. पण, आता उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंसोबतच्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला. साधारणत: 25 दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या काही शहरांमध्ये ठाकरे बंधूंना एकत्र येण्याबाबत आवाहन करणारे असे बॅनर झळकले होते. कट्टर राजकीय विरोधक सत्तेसाठी एकत्र येत असल्यानं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या भावांनाही मतभेद विसरून एकत्र यावं, असं अनेक मनसैनिकांना वाटत होतं. पण, पण, त्यानंतर आधी उद्धव ठाकरे आणि नंतर राज ठाकरेंनीही युतीबाबतच्या चर्चा फेटाळून लावल्या. आता तर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाखतीतून राज ठाकरेंसोबतच्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. मनसेसोबतच्या युतीला आधार नाही, त्यामुळं आपण त्याचा विचार करत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी युतीची शक्यता फेटाळली.
आता उद्धव ठाकरेंनी युतीला लाल झेंडा दाखवल्यानंतर मनसेनंही सूर बदलला आहे. आधी ठाकरे बंधुंनी एकत्र यावं अशी अपेक्षा करणाऱ्या मनसेच्या नेतेही आता ठाकरेंवर टीका करत आहे. आजपर्यंत आलेले कटू अनुभव बघता भविष्यात मनसेची ठाकरे गटासोबत युती होईल असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, दोघांची कार्यपद्धती वेगळी आहे. उद्धव ठाकरेंमुळे राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्याचं त्यांनी स्वत:च अनेकदा बोलून दाखवलंय. त्यामुळे दुखावलेले उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंशी हातमिळवणी करण्याची शक्यता तशी कमी आहे. पण, राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नाही.. त्यामुळंच भविष्यात ठाकरे बंधूंच्या भूमिकेत काही बदल होतो का? हे पाहण्यासाठी अजूनही वाट पाहावी लागणार, एवढं निश्चित.